– संदीप घिसे
पिंपरी – देवीदास आणि देवकीचा (बदलेली नावे) विवाह एप्रिल 2016 मध्ये झाला. सुरवातीपासून आई मुलीच्या संसाराबाबत विचारपूस करीत होती. नवीन लग्न झाल्याने प्रत्येक आई-वडिलांना काळजी असते, तशीच काळजी कदाचित देवकीच्या आई-वडिलांना असावी, असा समज देवीदासच्या आई-वडिलांचा झाला. काही दिवसानंतर देवकी आईच्या सल्ल्याप्रमाणे वागू लागली. अगदी भाजीत काय टाकू यापासून सुरवात झाली. कालांतराने देवकी सासू- सासरे व पतीशी भांडू लागली. माझ्या माहेरचे हे खपवून घेणार नाहीत, अशी धमकी ती देवू लागली. काही दिवसांनी आपल्या घरात बाळ येणार या बातमीने देवीदासचे आई-वडिल आनंदी झाले. मूलबाळ झाल्यावर देवकीचा स्वभाव बदलेल अशी त्यांना खात्री होती.
देवकीला मुलगा झाला आणि सर्व कुटूंब आनंदी झाले. बाळाला सांभाळावे लागते म्हणून घरातील सर्व काम देवीदासचे आई वडिलच करायचे. मात्र देवकीने पुन्हा आपल्या आईच्या सांगण्यावरून वागण्यास सुरवात केली. देवीदासच्या आई वडिलांना नातवाला घेऊही देत नव्हती. सहा महिन्यानंतर बाळ आपल्या आजी आजोबांकडे झेप घेत असतानाही देवकी आपल्या मुलाला आईच्या सांगण्यावरून आजी आजोबाकडे जाऊ देत नव्हती. याचे दुःख देवीदासच्या आई वडिलांच्या मनात होते.
एवढे दिवस सासू सासऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या देवकीने एकेदिवशी देवीदासवरही आईच्या सांगण्यावरून हात उचलला. यामुळे चिडलेल्या देवीदासनेही पत्नीशी सर्व संबंध तोडण्याची तयारी सुरु केली. भांडणापेक्षा घटस्फोट घेणे योग्य होईल, या निर्णयापर्यंत देवीदास आला. यामुळे आपल्या मुलाचे कसे होणार अशी चिंता देवीदासच्या आईला वाटू लागली. अखेर तिने पोलिसांच्या महिला सहाय्यक कक्षाकडे अर्ज केला. पोलीस उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांनी देवीदास, देवकी आणि दोघांच्याही आई-वडिलांना बोलविले.
सर्वांची बाजू ऐकून घेतल्यावर भांडणाचे मूळ पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी देवकीच्या आईचे समुपदेशन करीत मुलीचा सुखाचा संसार तुटण्यासाठी तुम्ही जबाबदार ठराल, अशा भाषेत सांगितले. देवकीच्या आईलाही आपली चूक समजली. त्यानंतर तिने मुलीच्या संसारात हस्तक्षेप करणे बंद केले. आता देवीदास आणि देवकी यांचा सुखाचा संसार सुरू आहे. देवीदासचे आई-वडिलही आता नातवाशी मनोसक्त खेळतात, गप्पा मारतात. सर्व घर आता आनंदाने भरून गेल्याने देवकीचे आई-वडिलही त्यांच्या आनंदात कधी कधी सहभागी होतात.
आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. यामुळे ते मुलीच्या संसारावर लक्ष ठेवतात. मात्र लक्ष ठेवण्याचे प्रमाण वाढले तर कदाचित मुलीचा संसार धोक्यात येऊ शकतो, हे मात्र सोईस्करपणे विसरले जाते. आजच्या घटनेतही मुलीच्या संसारात अती लुडबुड मुलीचा संसार तुटण्यापर्यंत पोहोचला. आईच्या सांगण्यावरून हे प्रकरण मारहाणीपर्यंत आणि घटस्फोटापर्यंत पोहोचले. मात्र पोलिसांनी वेळीच समुपदेशन केले आणि एक संसार वाचविण्यात यश मिळविले.