सूर्यकांत पाटणकर
पाटण – पाटण तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील ऐन काढणीच्या मोसमात आलेली पिके परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे शासनस्तरावर काम चालू आहे. मात्र पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याने आता पुन्हा परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
पाटण तालुक्यात सर्वाधिक पेरणी खरीप हंगामात केली जाते. भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन ही पिके खरीप हंगामात घेतली जातात. बागायती क्षेत्र कमी असल्याने खरीपातील मुख्य पिकांवर शेतकऱ्यांचा जोर असतो. पावसाच्या पाण्यावर खरीप पिके अवलंबून असल्याने समतोल पडणारा पाऊस या पिकांना पोषक ठरतो. मात्र यावर्षी पावसाचा जोर जास्त असल्याने संपूर्ण हंगामातील पिके जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत वाया गेली होती. तर पुन्हा परतीच्या अवकाळी पावसाने उर्वरित पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
पाटण तालुक्यात सुमारे अडीच हजार क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यामध्ये पेरणीची व लागणीचे भात पिक तसेच सोयाबीन, भुईमूग, ज्वारी अशा पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने भात, सोयाबीन, ज्वारी या पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके कुजली तर काही पिकांची उगवणही झाली नाही. तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले. अतिवृष्टीत पिकांचे झालेले नुकसानासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवून पिकांचे पंचनामे केले होते.
शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतीचे फोटो काढून कागदपत्रासह अर्ज कृषी विभागाकडे सादर केले होते. मात्र नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होवून प्रस्ताव सादर करूनही दोन महिने झाले तरी या काळात नुकसान झालेल्या व शासनाच्या यंत्रणेने पंचनामे केलेल्या पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसताना शासनाने आता परतीच्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू केले आहे. तालुक्यात 2500 हजार खरीप पिकांचे पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नसताना आता पुन्हा नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळणार का? केवळ कागदपत्रांच्या खर्चात हे शासन शेतकऱ्यांना पाडणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
तालुक्यात चाफळ, कोयना, मोरगिरी, मणदुरे, तारळे, ढेबेवाडी, चाफोली या विभागात मोठ्या प्रमाणात भात पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जाते. तर मल्हारपेठ विभागात सोयाबीन तर ढेबेवाडी, तळमावले या विभागात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परतीच्या अवकाळी पावसाने सर्वाधिक भात व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगा कुजल्या तर भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भुईमूगाच्या शेंगाना जमिनीत पुन्हा कोंब फुटू लागले. तर भात पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. साधारण 90 ते 120 दिवसांचे पीक असणाऱ्या भात पीक 150 ते 160 दिवस होवूनही पिके अद्याप शेतात आहेत.
भात पीक काढण्याचा हंगाम उलटला तरी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पिके काढून दिली नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान या परतीच्या पावसाने झाले आहे. त्यामुळे अगोदर अतिवृष्टी तर आता परतीचा अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दुहेरी संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. अतिवृष्टीच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे अश्वासन शासनाने दिले. मात्र अद्यापही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे पुन्हा परतीच्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे ही तरी मदत शेतकऱ्यांना मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
जनावरांचा चारा होणार महाग
खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकट आले असतानाच शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात जनावरांसाठी राखून ठेवण्यात येणाऱ्या भुईमूग पिकांचे वेलकटीचे गवत, भात पिकाच्या पेंढ्या या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या अवकाळी पावसात चारा भिजल्याने जनावरांसाठी साठविण्यात येणारा चाराही महाग होणार आहे.