चॉंद शेख
पोपटराव पवारः जलसंधारणाची कामे नियोजनबद्ध, जमिनीचा पोत बघून व्हावीत
नगर – महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळ पडत आहे म्हणून जलसंधारणाची भरमसाठ कामे झाली अन् दुसरीकडे त्याचे वेगळेच दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. गेल्या 50 वर्षांत ज्या जमिनी कधी उपळल्या नाहीत त्या यावर्षीच्या अतिरिक्त पाण्याने उपळल्या गेल्या. त्यामुळे अतिरिक्त जलसाठे निर्माण होणेसुध्दा धोकादायक आहे,अशी सडेतोड भूमिका आदर्श गाव योजनेचे प्रवर्तक,केंद्रीय जलसंधारण सुकाणू समितीचे सदस्य व आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी दैनिक प्रभातशी संवाद साधताना मांडली.
गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध भागात अतिरिक्त पाऊस झाला.काही ठिकाणी अजूनही होत आहे.नगर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. या अतिरिक्त पावसाने जिल्ह्यात 4 लाख 21 हजार 384 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असताना दुसरीकडे हा अतिरिक्त पाऊस व त्यामुळे निर्माण होणारे अतिरिक्त जलसाठे शेतपीकांचे प्रचंड नुकसान करत आहेत. याबाबत शेतकरी व विविध घटकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमकी ही परिस्थिती कशी व का उद्भवत आहे याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ पोपटराव पवार यांच्याशी चर्चा करताना वरील महत्वाचे मुद्दे समोर आले.
पवार म्हणतात, दुष्काळ पडतो म्हणून आपण जलसंधारणाची खूप कामे करतो. ती आवश्यकही आहे.मात्र,ही कामे करताना त्या जमिनीचा पोत,क्षमता याचा बिलकुल विचार केला जात नाही. क्षमतेपेक्षा अधिक पाणी अडविले व जिरवले जाते. क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठवणूक झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होते. ज्या जमिनी गेल्या 50 वर्षात कधीच उपाळल्या नाहीत त्या या पंधरा दिवसात उपाळल्या आहेत.
कोरड्या दुष्काळाबरोबरच ओल्या दुष्काळाचेही संकट
पाण्याचे व जलसंधारण कामाचे नियोजन कसे करावे याबाबत पवार सांगतात की,मुळात गावात किती पाऊस पडतो व किती वाहून जातो याची माहिती असणे आवश्यक आहे.ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्याचप्रमाणात तो अडविण्याची पध्दती असायला हवी.माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी कसे अडविले जावे याचे तंत्रशुध्द नियोजन हवे.मोघम जलसंधारणाची कामे झाली तर अतिरिक्त साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. साखळी पध्दतीने जलसंधारणाची जी कामे होत आहेत ती चुकीची आहेत.त्यामुळे अतिरिक्त पाणी जमिनीवर साठून राहते व त्यामुळे शेतात असणाऱ्या पिकांचे नुकसान होते.त्यामुळेच जलसंधारणाची कामे ही नियोजनबध्द होणे अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा कोरड्या दुष्काळाचे संकट जसे राज्यावर आहे तसेच ओल्या दुष्काळाचेही घोंगावेल!
पाण्याचा प्रश्न नक्षलवादापेक्षा गंभीर रूप धारण करू शकतो
आपल्याकडे पडणाऱ्या पावसाचा थेंब डोगरातला डोंगरात आणि शेतातला शेतात जिरला पाहिजे.पावसासोबत वाहून जाणारी माती वाचविणे,हे आपल्यापुढचे मोठे आव्हान आहे.डोंगराशी आणि मातीशी छेडछाड केली तर काय होते हे माळीणच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे.त्यामुळे ही माती वाचविण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यातून वनव्यवस्थापन होणे गरजेचे आहे.गावाचे आणि वनाचे नाते जपले पाहिजे.पाण्याचा प्रश्न नक्षलवादापेक्षा गंभीर रूप धारण करू शकतो.त्यामुळे त्यावर सर्वांनीच काम करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांप्रमाणेच शहरांमध्येही पाणी काटेकोरपणे वाचविणे आवश्यक आहे,असे मत पवार यांनी व्यक्त केले.
मतपेढ्या पाहून पाणीवाटप झाल्यास संघर्ष अटळ
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हा विषय नाही.त्यामुळे पाण्याचे नियोजन येत्या काही वर्षात केले नाही तर पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होईल. त्यातच मतपेढ्या डोळ्यासमोर ठेवून पाणीवाटप केले गेल्यास हा संघर्ष आणखी वाढेल अशी भिती पवार यांनी शेवटी व्यक्त केली.