पुणे(प्रतिनिधी) : करोना पार्श्वभूमीवर पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाहतुकीदरम्यान गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून या मार्गांवर शिवशाहीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वाहतूक सुरू झाल्यानंतर पुण्याहून विविध जिल्ह्यांत गाडी सोडण्यात येत आहेत. पुणे-नागपूर मार्गावरदेखील एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. करोनामुळे नागपूरहून पुण्याकडे येणारी रेल्वेसेवा बंद असून, खासगी वाहतुकदारांकडून जादा भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे मार्गावर मर्यादित थांबे देऊन प्रवाशांना कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता यावे या अनुषंगाने या मार्गावर वातानुकूलित शिवशाही (आसनी) 9 अतिरिक्त फेऱ्यांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
पुणे-नागपूर मार्गावर धावणाऱ्या शिवशाहीला औरंगाबाद, जालना, चिखली, खामगाव, अकोला, अमरावती या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. या गाड्या शिवाजीनगरहून (वाकडेवाडी) दुपारी 1, 3, 4, 4.30, 5, 5.30, 6, 6.30, 7, 8.30 सुटणार आहे.
तर नागपूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवशाहीला अमरावती, अकोला, खामगाव, चिखली, जालना, औरंगाबाद या मार्गांवर थांबा देण्यात येणार असून, याचे आरक्षण सुरू झाल्याची माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली.