पिंपरी – अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आल्याने गावी जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) वल्लभनगर आगाराकडून जादा बस सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी आगाऊ आरक्षणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच भागात 9 बस सुरु करण्यात आल्या आहेत. तर, ग्रुपने प्रवास करायचा असल्यास यासाठी आगारातून गाडीची व्यवस्था केली जाणार असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी असल्याने येथे राज्यातील व पराज्यातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एस.टी आगारातून हजारोंच्या संख्येने नागरिक रोज प्रवास करतात. हीच गोष्ट लक्षात घेत, प्रवाशांच्या सुविधेसाठी वल्लभनगर आगारातून राज्यातील विविध भागात 9 जादा बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, लातूर, सांगली, चिपळूण व दापोली आदी ठिकाणी बस सोडण्यात आल्या आहे. तर, 35 ते 40 प्रवाशांचा एक ग्रुप जर एकाच ठिकाणी प्रवास करण्यासाठी आला तर, त्यांना बस उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शहरात मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी राज्यभरातून आले आहेत. दिवाळीसाठी या विद्यार्थ्यांना गावी जाता यावे, यासाठी जादा बस सुरु करण्यात आल्या आहेत. विदर्भासाठी अकोला, मराठवाड्यासाठी लातूर तर, कोकणासाठी दापोली, चिपळूण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, सांगली व कोल्हापूर अशा बस सुरु करुन आगार प्रशासनाने समन्वय साधला आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळत असून आगारालासुद्धा यातून महसूल मिळत आहे.
तिकीट दरवाढ अद्याप नाही
दरवर्षी दिवाळी निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाकडून काही प्रमाणात दरवाढ करुन एसटीचा महसूल वाढवला जातो. मात्र, यंदा अद्याप तरी, असे परिपत्रक परिवहन मंत्रालयाकडून आगाराला प्राप्त झाले नाही. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ करुन परिवहन मंत्रालय नागरिकांची नाराजी ओढावून घेणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे बहुधा जादा बस सुरु करुनही अद्याप तिकिटाच्या दरात वाढ झाली नाही.