भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर आज सकाळी अमेरिकेत दाखल झाले आहेत. पुढील पाच दिवस म्हणजे २८ मेपर्यंत ते अमेरिकेच्या दौरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
भारतातील लसींच्या पुरवठ्याविषयी ते आरोग्य मंत्रालय आणि विविध लस उत्पादक कंपन्यांच्या सीईओंना भेटणार आहेत. १ जानेवारी २०२१ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या प्रवेशानंतर परराष्ट्रमंत्री पहिल्यांदा न्यूयॉर्कला आले आहेत.
देशातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. मात्र, रुग्णांचा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही. देशभरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा ३ लाखाहून अधिक झाला आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, रविवारी रात्री १० वाजेपर्यंतच्या २४ तासात ४ हजार ५६ रुग्णांनी जीव गमावल्यानंतर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढून ३,०३,३५५ वर पोहोचला आहे. यानंतर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा असा देशा ठरला आहे, ज्या ठिकाणी कोरोनामुळे ३ लाखाहून अधिकांनी आपला जीव गमावला आहे.