नगर – नगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे विळदघाट ते केडगाव-अरणगाव काम पूर्ण झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे शहरावर पडणारा अवजड वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. नगर शहरातून पुणे,औरंगाबाद,मनमाड,सोलापूर,दौंड तसेच कल्याण-विशाखापट्टणम असे विविध प्रकारचे महामार्ग जातात. या महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी तसेच अपघात होतात.
त्यामुळे ही अवजड वाहतूक शहराबाहेरून बाह्यवळण रस्त्याने वळविण्यासाठी सुमारे 15 वर्षापूर्वी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे वाहनचालकांसाठी अत्यंत जिकरीचे बनले होते. त्यामुळे बहुतांशी वाहनचालक शहरातूनच अवजड वाहने नेत होते. या अवजड वाहनांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अपघात झाले. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला.
त्यामुळे बाह्यवळण रस्ता दुरूस्त करावा यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला. राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली. हे काम आता बहुतांशी पूर्ण झाले असून आता केवळ रस्त्याच्या कडेच्या साईडपट्ट्या ,दिशादर्शक फलक,मैलाचे दगड एवढेच काम बाकी असून तेही लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे वाहनचालक बाह्यवळण रस्त्याने वाहने नेणे टाळत होते. त्यामुळे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण पडत होता.
तसेच या वाहनचालकांचाही अर्धा ते एक तासाचा वेळ जास्त जात होता. मात्र आता बाह्यवळण रस्त्यालाच पसंती सर्वजण देवू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या वेळेत तब्बल अर्धा ते एक तासाची बचत होवू लागली आहे. तरीही काही वाहनचालक आपली अवजड वाहने शहरातूनच आणत असल्याने वाहतुकीची कोंडी अधून-मधून निर्माण होते. यामुळे वाहतूक पोलीस शाखेने काहीतरी यावर उपाययोजना केल्या पाहिजेत,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पुण्याहून मनमाड व औरगांबादच्या दिशेला जाणारी वाहतूक केडगाव बायपास चौकातून कल्याण रोड,निंबळक मार्ग विळदघाट अशी सुरु झाली आहे. तसेच औरंगाबाद, मनमानकडे जाणारी वाहतूक अद्यापही शहरातूनच सुरु आहे. अरणगाव ते वाळुंज या बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर ही सर्व वाहतूक शहराबाहेरूनच होऊ शकणार आहे.