कातरखटाव – कातरखटावसह तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजअखेर तालुक्यात 554 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कातरखटाव परिसरातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरले आहेत. “उत्तरा’ नक्षत्रातच जोरदार पाऊस झाला असून आता इथून पुढे पंधरा दिवस “हस्त’ नक्षत्र धो- धो कोसळण्याची चिन्हे आहेत.
परिसरातील अतिपावसाने डांभेवाडी, शिंगाडवाडी, येलमरवाडी, तडवळे, डाळमोडी, खातवळ, कणसेवाडी याठिकाणी नाला बंडिंग, ताली फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पाझर तलाव भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी समाधान आहे तर काही ठिकाणी शेतकरी चिंतेत असून “कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे पिकं पाण्यात गेली असून पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे.
बाजरीच्या पिकाने माना खाली टाकल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या राशी खोळंबल्या आहेत. हा पाऊस रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी उपयुक्त ठरणार असला तरी आजमितीला या हंगामातील उडीद, मका, बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पूर्ण पिकं वाया जाण्याची चिन्ह असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळेल या आशेने पिकांची लागवड केली होती.
परंतु, लागोपाठ तीन ते चार दिवस पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे काढणीसाठी आलेल्या शेतात पाणीच पाणी होऊन पिकं पूर्णपणे चिखलमय झाली आहेत. मोठ्या कष्टाने पिकवलेली पिकं आपल्या डोळ्यादेखत सडण्याच्या भीतीने शेतकरी संकटात यण्याची भीती आहे. मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नक्षत्रानुसार “उत्तरा’ने दमदार हजेरी लावली असून अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. आत्ता पुढे “हस्त’ पंधरा दिवस बरसणार असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे.
एकीकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणत्याच मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सततच्या अतिपावसाने सर्वात फटका सोयाबीनला बसला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी, प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.