मुंबई – प्राप्तिकर विवरण सादर करण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे. त्यामुळे आता मुदतवाढ देण्यात येणार नाही असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले असतानाच देशभरातील बऱ्याच करदात्यांनी विवरण सादरीकरणाची शेवटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
विवरण सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
गेल्या वर्षी करोनामुळे ही तारीख वाढवून 31 डिसेंबर इतकी करण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याच करदात्यांना यावेळी पुन्हा मुदतवाढ मिळेल असे वाटत होते. मात्र गेल्याच आठवड्यात केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज यांनी मुदतवाढ देण्याची काही गरज वाटत नाही असे सांगितले. प्राप्तिकर दात्यांनी वेळेवर विवरण सादर करण्याची विनंती त्यानी केली होती.
ई -फाइलिंग वेबसाईटवर बऱ्याच अडचणी येत असल्याचे काही करदात्याचे म्हणणे होते. मात्र असा काही प्रकार घडला नसल्याचे प्राप्तिकर मंडळाने स्पष्ट केले आहे. बरेच प्राप्तिकर दाते अखेरच्या क्षणी विवरण सादर करण्याची गडबड करतात. गेल्या वर्षी शेवटच्या दिवशी तब्बल 50 लाख करदात्यांनी विवरण सादर केले होते. यावर्षी एक कोटी करदात्यांनी जरी शेवटच्या दिवशी विवरण भरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कसलीही अडचण येणार नाही असे बजाज यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसापूर्वी अखिल भारतीय कर सल्लागार संघटनेने अर्थ मंत्रालयाला आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला विवरण सादर करण्याची तारीख पुढे ढकलावी असे आवाहन केलेले आहे. मात्र अशा प्रकारची विनंती आपण करणार नाही असे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संघटनेने सांगितले आहे. मात्र बऱ्याच करदात्यांनी ट्विटरवर विवरण सादर करण्याची तारीख पुढे ढकलण्याची मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान अर्थमंत्रालयाने जाहिरात प्रसिद्ध करून आणि पत्रक काढून करदात्याना वेळेवर विवरण सादर करण्याचा आग्रह पुन्हा केला आहे. यावर्षी विवरण सादर करण्यास मुदत वाढ देण्यासाठी कसलेही कारण नसल्याचे अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सुचित केले.