नवी दिल्ली – करोनाचा सामना करण्यासाठी लघु उद्योगांना केंद्र सरकारने साडेचार लाख कोटी रुपयांची तातडीची कर्ज हमी योजना सुरू केली होती. या योजनेला आणखी सहा महिने म्हणजे 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बऱ्याच लघु उद्योगांकडून या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. या मागणीवर सर्वसमावेशक विचार केल्यानंतर या योजनेला मुदतवाढ देण्याची गरज आहे असे सरकारला वाटले.
त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी 4.2 लाख कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले होते. मात्र लघुउद्योगांनी या संपूर्ण पैशाचा वापर केलेला नाही. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असल्याचेही विश्लेषकांनी सांगितले.
या योजनेला मुदतवाढ देण्याबरोबरच या योजनेअंतर्गत होणाऱ्या कर्जपुरवठयालाही 30 जून 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव संपुष्टात येण्याअगोदरच देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली होती.त्यामुळे इतर उद्योग प्रमाणे लघुउद्योगावर याचा परिणाम झाला असल्याचे सरकारच्या लक्षात आले.
ज्या उद्योगानी या योजनेचा अगोदर फायदा घेतलेला नाही असे उद्योग या योजनेचा फायदा घेऊ शकणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.लघुउद्योगांना या योजनेस मुदतवाढ दिल्यामुळे त्यांना आगामी काळातील उत्सवाच्या काळात आवश्यक वस्तूचे उत्पादन करण्यास मदत होईल अशी आशा अर्थ मंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेचा आतापर्यंत 1 कोटी 15 लाख लघुउद्योगांनी फायदा घेतला आहे.24 सप्टेंबर 2021 पर्यंत या योजनेअंतर्गत 2.86 लाख कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जे कर्ज मंजूर करण्यात येते त्यावरील व्याजदर साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त असू नये अशी मर्यादा अर्थमंत्रालयाने घातली आहे.