पुणे – उच्च शिक्षण विभागाने वारंवार सूचना देऊनही अनेक शिष्यवृत्ती लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यता देण्यासाठी शैक्षणिक संस्थांस्तरावर प्रलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे. मुदतवाढ 21 मे पासून पाच दिवसांपर्यंत राहील.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जावर शैक्षणिक संस्था स्तरांवरून मान्यता देणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यास पात्र विद्यार्थी वंचित राहू शकतो. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने मुदती वाढ देऊनही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही शैक्षणिक स्तरावर अर्ज प्रलंबित राहत आहेत.
आता उच्च शिक्षण विभागाने दि. 21 पासून 5 दिवसापर्यंत ही मुदतवाढ दिली आहे. या वेळेत उच्च शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवावढ देण्यात येणार नाही. मुदतीनंतर प्रलंबित राहिलेल्या अर्जांबाबत भविष्यात उद्भवणाऱ्या 22 विद्यापीठांचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वस्वी जबाबदार राहील. अर्ज मंजूर न झाल्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयांची प्राचार्यांची राहणार असल्याचे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी सांगितले.