मुंबई: भाजपा शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे, त्यामुळे ते काम समर्थपणे पार पाडण्याची आमची भूमिका आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी देश आणि राज्यातील विविध घडामोडींवर पवार यांनी भाष्य केले. काल दिल्लीमध्ये पोलिसांना वाईट वागणूक मिळाली. युनिफॉर्म मध्ये असतानाही पोलिसाला मारहाण झाली, पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या ज्यापद्धतीने वाढत आहे, त्यामुळे देशातील पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. संपूर्ण देशात पोलिसांची परिस्थिती हलाखीची आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींचे अशारितीने मनोबल खच्ची झाले तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी टिप्पणी पवार यांनी केली.
दिल्ली पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी दिल्लीच्या जनतेने भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे. दिल्लीत जो प्रकार घडला त्याची गंभीर नोंद घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.