पुणे – बॅंकिंग क्षेत्राबद्दल बराच संभ्रम निर्माण झाला असतानाच येस बॅंकेची आर्थिक परिस्थिती खराब झाली असल्याच्या भावनेने या बॅंकेच्या शेअरच्या भावावर गेल्या 4 दिवसांपासून नकारात्मक परिणाम झाला होता. मात्र, बॅंकेची परिस्थिती उत्तम असल्याचे बॅंकेने स्पष्ट केल्यानंतर गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या जीव भांड्यात पडला आहे.
शेअर बाजारात गेल्या 4 दिवसांत बॅंकेची फार मोठी हाणी झाल्यानंतर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवणीत गिल यांनी जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, बॅंकेची वित्तीय परिस्थिती आणि ताळेबंद मजबूत आहेत. बॅंकेची भांडवलाची उपलब्धता रिझर्व्ह बॅंकेने ठरवून दिलेल्या निकषापेक्षा कितीतरी चांगली आहे.
बॅंकेने हे स्पष्टीकरण केल्यानंतर या बॅंकेच्या शेअरच्या भावात गुरुवारी सुधारणा झाली आणि गेल्या 4 दिवसांपासून झालेला घसारा कमी झाला. बॅंकेचे प्रवर्तक राणा कपूर यांच्याकडील बरेच शेअर शेअर बाजारात विकल्या गेल्यानंतर त्या बॅंकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या मनात चिंता निर्माण झाली होती.
गेल्या 3 दिवसांपासून शेअर बाजारात नोंदवलेल्या बऱ्याच बॅंकांच्या शेअरच्या भावात घसरण झाली आहे. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने ही भारतीय बॅंकिंग क्षेत्राची परिस्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे.