नवी दिल्ली – बिहारचे प्रधान सचिव सतीश कुमार यांनी आज, ‘बिहारमध्ये पीपीई किट व एन-९५ मास्कचा तुटवडा असून केंद्र सरकारकडे ५ लाख पीपीई किटची मागणी केल्यानंतर केवळ ४ हजार किट देण्यात आले.’ अशी माहिती दिल्याने देशभरामध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे, ‘केंद्राने राज्यांना २ दिवसांपूर्वी उपलब्ध पीपीई किट पाठवले असून पीपीईची निर्मिती सुरु आहे.’असे स्पष्टीकरण देण्यात आले.
कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाच्या दैनिक वार्तालापामध्ये सहसचिव लव अग्रवाल यांनी आज, “पीपीई किट हे परदेशातून आयात केले जात असल्याने देशामध्ये सुरुवातील कमतरता भासली. मात्र केंद्र सरकारने याबाबत जानेवारी महिन्यापासूनच पावले उचलली असून काही स्वदेशी निर्मात्यांना देखील पीपीई किटच्या निर्मितीस सुरुवात केली आहे. सरकारतर्फे पीपीई किट उपलब्ध असणाऱ्या देशांकडून ती विकत घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.” अशी माहिती दिली.
लव अग्रवाल यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “अनेक संस्था पीपीई किटचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारला मदत करत आहेत. आम्ही गेले २ दिवस उपलब्ध पीपीई राज्यांना पाठवले असून आणखी किटची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. पीपीईच्या वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.”