नियमांत बदल आवश्यक : विविध संघटनांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा
किरकोळ दंड आकारून होते दोषींची सुटका
पुणे – एखाद्या प्राणी अथवा पक्ष्याला क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यास शिक्षा दिली जाते. पण, यासंबंधीचा सध्याचा कायदा कालबाह्य आहे. यामध्ये बदल करत अधिक कठोर दंडाची तरतूद करावी, अशी मागणी विविध प्राणीप्रेमी संघटना करत आहे. याबाबत केंद्र सरकारकडे सातत्याने अर्ज देण्यात आल्याचेही या संस्थांनी म्हटले आहे.
देशात कोठेही एखाद्या प्राणी अथवा पक्ष्याला अमानुष वागणूक दिल्यास दोषी व्यक्तीस “प्रिव्हेंशन ऑफ ऍनिमल क्रुएल्टी (पीसीए) 1960′ या कायद्यांतर्गत शिक्षा सुनावली जाते. मात्र, याअंतर्गत दोषीवर फक्त 25 ते 50 रुपये दंड आकारला जातो.
अशा स्थितीत इतकी किरकोळ तरतूद केल्याने प्राण्यांविरोधात होणारे अत्याचार थांबण्याऐवजी या कायद्याचे गांभीर्यच लोकांमध्ये राहात नाही. तसेच अनेकदा पोलीस प्रशासनालाही या कायद्याबाबत फारशी माहिती नसते.
त्यामुळे प्राणी-पक्षी यांना दिली जाणारी अमानुष वागणूक रोखण्यात फारसे यश येत नसल्याचे मत व्यक्त करत “पेटा’ इंडिया, फेडरेशन ऑफ इंडियन ऍनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या संस्थांनी या कायद्यातील शिक्षेची तरतूद अधिक कठोर करावी, अशी मागणी केली आहे.
या घटना रोखणार कशा?
देशात प्राणी अत्याचाराच्या अनेक घटना समोर येतात. यामध्ये पिकांचा बचाव, शेती, करमणूक अशा विविध कारणांसाठी प्राण्यांना अमानुष वागणूक देण्याच्या अनेक घटना घडतात. याचे उदाहरण म्हणजे केरळ येथे हत्तीणीच्या तोंडात अननसाच्या माध्यमातून स्फोटके भरण्यात आल्याची घटना समोर आली. तर, पश्चिम घाटात बऱ्याच भागांत पेरूमध्ये स्फोटके पेरली जाण्याचे प्रकार पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त घरातील कुत्रा-मांजर यासारखे पाळीव प्राणी तसेच विविध पक्षी विक्री केंद्रामध्ये होणारे अत्याचार हीदेखील गंभीर बाब असल्याचे प्राणिमित्रांनी सांगितले आहे.