नवी दिल्ली – देशामध्ये काही इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या आगी का लागतात याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने तज्ञ समितीची नेमणूक केली होती.
या समितीने चौकशी पूर्ण केली आहे आणि हा अहवाल 30 मे रोजी सरकारला सादर करण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना आगी लागू नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात काही शिफारशी या तज्ञ समितीकडून केल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. मात्र काही वाहनांना आग लागल्यामुळे ग्राहकाच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीमध्ये ज्या वाहन निर्मात्या कंपन्यांनी वाहन निर्माण करताना काही चुका केल्या असतील अशा कंपन्यांना दंड ठोठावला जाणार आहे. त्याचबरोबर या कंपन्यांनी अशी अयोग्य वाहने ताबडतोब परत घ्यावीत अशा सूचना रस्ते वाहतूक मंत्रालयाने या कंपन्यांना अगोदरच दिल्या आहेत.
गेल्या महिन्यात पुण्यात ओला इलेक्ट्रिक या कंपनीच्या एका स्कूटरला आग लागली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन रस्ते वाहतूक मंत्रालयाने तज्ञ समितीला या प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले होते. भारतामध्ये इतर काही शहरातही काही इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत वृत्त माध्यमातून जोरदार चर्चा चालू आहे. या इलेक्ट्रिक कंपन्या सुट्या भागाची शहानिशा करीत नाहीत असे मत काहींनी व्यक्त केले आहे. हे सुटे भाग इतर देशात तयार केले जातात. तेथील नैसर्गिक परिस्थिती वेगळी असते आणि भारतातील नैसर्गिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या वाहनांना आगी लागल्या असतील असे काही जणांनी सांगितले आहे. आता 30 मे रोजी तज्ज्ञ समितीचा या विषयावरील अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर या आगी नेमक्या का लागल्या आणि आगी लागू नयेत साठी काय करावे लागेल त्या संदर्भातील माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.