मुंबई – गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाही. या पूर्वी या देशात असं कधीच झालं नव्हतं. देशात नुसता हाहाकार माजला आहे. याच मुद्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावं, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,’ मोहन भागवत हे आदरणीय आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांच्या मताला देशात आजही महत्त्व आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेतं वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत.
हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिरा इतकाच महत्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेला होती. देशात आज जे सगळं काही सुरु आहे त्यावर मोहन भागवत यांनी आपलं मत व्यक्त करावं.’ असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, भारतात करोना बळींची संख्या सोमवारी तीन लाखांचा टप्पा ओलांडून गेली असून २४ तासात ४४५४ बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिका व ब्राझीलनंतर तीन लाखांपेक्षा अधिक बळी जाणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.