पुणे – ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार 893 शेतकऱ्यांच्या 1 लाख 26 हजार 344 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
त्याकरिता 138 कोटी 73 लाख 47 हजार रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. “क्यार’ वादळामुळे ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस पडला. सुरुवातीला हा परतीचा पाऊस असल्याचा समज झाला होता. मात्र पावसाचा धुमाकूळ पाहता, हे प्रकरण काही वेगळे असल्याचे समोर आले. तोपर्यंत ऊस, मका, सोयाबीन, तूर, तांदूळ या पिकांना मोठा फटका बसला.
जिल्ह्यातील 1 हजार 454 गावांमधील 1 लाख 59 हजार 969 शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचे प्राथमिक सर्वेक्षणात समोर आले होते. त्यानंतर गावपातळीवर पंचनामे केल्यानंतर या संख्येत मोठी वाढ झाली. 3 लाख 6 हजार 683 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती. त्याचा जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याची बाब पंचानाम्यात समोर आली आहे. त्यामध्ये 184 गावांमधील 56 हजार 513 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.