मुंबई – रिझर्व्ह बॅंकेचे व्याज दर ठरविणाऱ्या पतधोरण समितीची तीन दिवसाची बैठक बुधवारी सुरू झाली. शुक्रवारी रिझर्व्ह बॅंक बैठकीतील निष्कर्ष जाहीर करेल.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर बराच परिणाम झाला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी रिझर्व्ह बॅंक या पतधोरणावेळी तरी व्याजदर जैसे थे ठेवण्याची अपेक्षा विश्लेषकाकडून आणि उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महागाई डोके वर काढत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला यातून संतुलित मार्ग काढावा लागणार आहे.
एप्रिल महिन्यातील पतधोरणावेळी रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट चार टक्क्यावर तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यावर कायम ठेवला होता. सरलेल्या वर्षातील विकास दर फार मोठ्या प्रमाणात कोसळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी तो उणे 7.3 टक्के इतका भरला आहे. त्याचबरोबर शेवटच्या तिमाहीतील विकासदर सकारात्मक आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक महागाई कमी करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता होती.
मात्र दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच शहरात निर्बंध लागू केले जात असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला भांडवल सुलभता वाढवून व्याजदर कायम ठेवण्याची भूमिका घ्यावी लागेल असे दिसते. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात वार्षिक अहवाल सादर केला आहे.
त्यामध्ये विकास दर वाढता ठेवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंक यावेळी तरी उदार पतधोरण जाहीर करण्याची शक्यता आहे, असे समजले जात आहे.