– शर्मिला जगताप
फार फार वर्षांपूर्वी एका वसंत ऋतूत काही मोजके सैनिक शिस्तबद्ध जंगलाच्या वाटेने जात होते. त्यांच्या हातात तलवारी, भाले, धनुष्यबाण अशी शस्त्रे होती. मध्यभागी अंबारीवर स्वार होऊन चौय नावाचा राजा दिमाखात जात होता.
प्रत्येक वर्षी राजा वसंत ऋतूत जंगलात जाऊन शिकार करत असे, तसे तो आजही जात होता. त्याचा सेनापती यांग योंची हा धनुर्धारी विद्येत पारंगत होता. धनुर्धारीत त्याचा कोणी हात पकडू शकत नव्हते. त्याचा निशाणा अचूक होता.
जेव्हा हे सैनिक एका मोठ्या झाडाखालून जात होते तेव्हा झाडावर बसलेले एक माकड मोठा आवाज करून या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारू लागले. त्याचा उपद्रव बघून सैनिकांनी माकडाच्या दिशेने बाण सोडले.
मात्र, चलाक माकडाने सर्व बाण चुकविले. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. स्वतः राजा चौय हातात धनुष्य घेऊन माकडाच्या दिशेने बाण सोडू लागला.
मात्र, एकही बाण माकडाने अंगाला लागू दिला नाही. वाघ, सिंह, हत्तींची शिकार करणारा चौय माकडाला एकही बाण लागत नाही म्हणून अजूनच चवताळला. सेनापती यांग मात्र शांत उभा होता. सर्वांचे प्रयत्न थकल्यानंतर राजाने यांगला त्या माकडाला ठार मारण्याचा आदेश दिला.
यांगने राजाचा आदेश पाळून आपल्या खांद्यावरील धनुष्य हातात घेतला. एक बाण धनुष्याला लावून माकडावर निशाणा धरला. त्याबरोबर माकड एका जागी थांबून मोठ्याने रडू लागले. हा काय प्रकार आहे म्हणून राजाला प्रश्न पडला.
यांग राजाला म्हणाला, कदाचित या माकडाला माहिती असावे की माझा कधी निशाणा चुकत नाही. म्हणून आपण आता मरणार या भीतीने हे माकड रडत असावे.
यातून राजा चौयला साक्षात्कार झाला की प्राण्यांनाही मरणाची भीती वाटते. राजाने त्या माकडाला अभय दिले. राजा जेव्हा आपल्या नगरीत परतला तेव्हा त्याने आदेश दिला की यापुढे कुणीही प्राण्यांची शिकार करणार नाही.
याचे सर्व श्रेय सेनापती यांगला जाते. अंहिसेचे तत्त्व जन्माला घातलेला यांग आज मात्र लोकांच्या आठवणीत राहिला नाही. (तैवान या देशातील लोकप्रिय लोककथेचा अनुवाद)