मुंबई: देशभरात एक्झिट पोलचे निकाल पाहता भाजपाची सत्ता पुन्हा येणार या चर्चांना उधाण आलेय. मात्र या एक्झिट पोलच्या निकालांवरून संशयसुद्धा व्यक्त होतोय. भाजपाला ३०० च्या वर जागा मिळणार असे अंदाज एक्झिट पोल व्यक्त करत असले तरी यावर विश्वास ठेवायचा कसा? हे केवळ अंदाज आहेत. त्यातही आजवरचा इतिहास पाहता निवडणुकीतील प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोलचे अंदाज यात तफावत दिसून आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.
एक्झिट पोलबद्दल संशय घेण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर मार्केटने घेतलेली उसळी. एक्झिट पोलचा वापर शेअर मार्केटमधून पैसा काढण्यासाठी करण्यात येतोय का? पैशांच्या मोबदल्यात एक्झिट पोलचा निकाल बदलल्याचा संशयही अनेकांनी व्यक्त केला आहे, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.
दुसरं कारण म्हणजे उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टी निवडणुकाच लढवत नाही. पण एक्झिट पोलमध्ये मात्र आम आदमी पार्टीला जवळपास २६ टक्के मतदान झाल्याचं दाखवण्यात आले. त्यामुळे एक्झिट पोलच्या निकालांवर विश्वास ठेऊन जल्लोष करणे म्हणजे ‘शीतावरून भाताची परीक्षा’ करण्यासारखे आहे.