लंडन- नियमित व्यायाम आणि संतुलीत आहार ही सुखी जिवनाची गुरूकील्ली असल्याचे पुस्तकी वाक्य आपण नेहमी वाचतो किंवा ऐकतो. ते अनेकदा सिध्दही झाले आहे. मात्र तरीही रोजच्या जगण्याच्या संघर्षात त्याकडे दुर्लक्ष होते. रोजगाराच्या धावपळीत व्यायामासाठी जो आवश्यक वेळ आहे तो दिला जात नाही. त्यामुळे अकाली मृत्यूची प्रकरणे समोर येतात. तसे जर होउ द्यायचे नसेल तर नियमित शारीरिक हालचाली करणे किती आवश्यक आहे, हे अलिकडेच एक आणखी नव्या अहवालात समोर आले आहे.
संबंधित अहवालानुसार तुमची जीवनशैली तुमचे आरोग्य आणि जीवनमान निर्धारीत करत असते. त्यात काही शिस्त असेल तर दीर्घायुषी होता येते. मात्र तसे जर नसेल तर आयुष्याची दोरी कमकुवत होते. जीवनशैलीशी निगडीतच अनेक आजारांचा सामना फार कमी वयात करावा लागतो व त्यातच अखेर ऱ्हास होतो. शरिराचे अतिरिक्त लाड म्हणजे हालचाली कमी असणे, मद्यपान अथवा धुम्रपान करणे, तंबाखुचे सेवन करणे या गोष्टी हानीकारक असून त्यामुळे अकाली मृत्यूची संभावना बळावते. हे प्रमाण थोडेथोडके नसून जगभरात वर्षाकाठी 39 लाख लोकांचा असा अवकाली मृत्यू होतो. मात्र शरीर सक्रिय असेल किंवा हालचाली केल्या जात असतील तर मृत्यूचा हा दर कमी होत असल्याचे आढळून आले आहे.
संबंधित टीमने जगभरातील 168 देशांतील आकडेवारीचे यासंदर्भात विश्लेषण केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही आठवडाभरात किमान 150 मिनीटे वेळ व्यायामासाठी दिला जाणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तुम्ही मध्यम स्वरूपाच्या एरोबिक हालचाली करत असाल तर 150 मिनीटे आणि जोरदार स्वरूपाच्या हालचाली असतील तर आठवडाभरात किमान 75 मिनीटे व्यायाम करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. व्यायाम करणाऱ्या अथवा शारीरिक हालचाली करणाऱ्या महिलांच्या मृत्यूचे प्रमाण सरासरीपेक्षा 14 टक्के आणि पुरूषांचे सरासरीच्या 16 टक्के कमी असल्याचे आढळून आले आहे. एकुणात ही आकडेवारी 15 टक्के असल्याचे म्हटले गेले आहे. याचा अर्थ कोणताही खेळ असो अथवा अन्य शारीरिक हालचालींमुळे इतके टक्के लोक अकाली मृत्यूला थोपवण्यात यशस्वी ठरले आहे. संख्येत सांगायचे झाले तर ही संख्या 39 लाख होते, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.