नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांना देशहितासाठी केवळ पंतप्रधानपदावरूनच नव्हे तर राजकारणातूनही हद्दपार करा असे आवाहन तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगाल मध्ये घेतलेल्या जाहींरसभेत ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर ममतांनी त्यांच्यावर हा निशाणा साधला. त्या म्हणाल्या की मोदींनी आजवर केवळ लोकांना खोट्या वक्तव्यांशिवाय काहींही दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी आता अधिक खोटे बोलू नये म्हणून लोकांनीच त्यांच्या तोंडावर पट्टी लावण्याची वेळ आली आहे.
मोदींनीच देशाला लुटले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की त्यांनी लुुटलेल्या प्रत्येक पैशाचे उत्तर त्यांच्याकडून आम्ही घेऊ. गेली साडे चार वर्ष केवळ जगभ्रमंती शिवाय मोदींनी काहीही केलेले नाही असे नमूद करून ममता म्हणाल्या की या देशात शेतकरी आत्महत्या करीत होते त्यावेळी मोदींना त्यांची चौकशी करायला वेळ मिळाला नाही किंवा ते त्यांच्याकडे फिरकले नाहींत. नोटबंदीमुळे बॅंकांच्या लाईनीत अनेकांचे प्राण गेले आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यावेळी मोदी कुठे होते असा सवाल त्यांनी केला.जलपैगुडि जिल्ह्यातल्या नगरकाटा मतदार संघातील सभेत त्या बोलत होत्या.