पुणे ( प्रभात वृत्तसेवा ) – वनातील वाट चुकून कोथरूड परिसरात आलेल्या रानगव्याचा दुर्दैवी अंत ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. ज्या प्रकारे गव्याला रेस्क्यू केले, घाबरलेल्या अवस्थेत सैरावैरा पळत त्याची पाच-सहा तास चाललेली सुटकेची झुंज अखेर संपली आणि त्याचा मृत्यु झाला. या गव्याला दुकानासमोर त्याची प्रतिकृती उभारून अनोख्या पद्धतीने “भारत फ्लॅग फाऊंडेशन’ने श्रद्धांजली वाहिली आहे.
“घटनेचे गांभीर्य ओळखुया, निसर्गात ढवळाढवळ थांबवूया’, “आम्हाला माफ कर ,आम्ही तुझे गुन्हेगार आहोत’ असा शोकसंदेश देत त्या गव्याची माफी मागणारे अनेक बॅनर त्यांनी रस्त्यावर लावले आहेत. तर फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांच्या पासोड्या विठोबाजवळील दुकानाबाहेर त्यांनी गव्याची प्रतिकृती उभारली आहे. वाट चुकून माणसांच्या जंगलात आलेल्या या गव्याच्या मृत्युच्या घटनेतून तरी लोकांनी बोध घ्यावा असे त्यांचे म्हणणे आहे.
दुकानासमोर ठेवलेल्या प्रतिकृतीसमोर “जंगले राखुया, वन्यजीव जगवूया’ असा संदेशही मुरुडकर यांनी लिहिला आहे.