रांजणगाव गणपती (वार्ताहर) – करोनाच्या आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा 300 युनिटच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र युवाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात उदर निर्वाहाची साधने बंद असल्यामुळे गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय या सर्वांचीच आता दमछाक होत आहे. टाळेबंदी काही अंशी शिथिल झाली तरी ही अनेकांना अद्याप रोजगार उपलब्ध नाही.
गाठी शी असलेला पैसा ही संपत आला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरभाडे भरता आले नाही. वीजबिल भरता येत नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. आर्थिक संकटात असलेले व दरमहा 300 युनिटच्या आत वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांचे तीन महिन्यांचे वीजबील माफ करण्यात यावे, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.