मुंबई : राज्यात काही महिन्यापूर्वी शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन करण्यात आले. यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. हा शपथविधी सोहळा रितसर पार पडला असला तरी तत्पूर्वी राज्यपालांकडून बहुमत असणाऱ्या पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले जाते. मात्र आता या निर्मणत्रणावरच विरोधी पक्षाने मोठा दावा केला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सध्या राज्यात सत्ताधारी असणारे शिंदे-फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रणच दिले नव्हते असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा दावा केला आहे. संबंधित माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आल्याचेही नाना पटोलेंनी म्हटले आहे.
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाना पटोले यांनी, “खरं तर, माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत राजभवनातून एक पत्र मिळाले आहे. शिंदे-फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिलं नव्हतं, अशा पद्धतीचं पत्र राज्यपालांच्या कार्यालयातून मिळाले आहे. आम्ही अनेकदा सांगत आहोत की, हे सरकार असंविधानिक आहे. पण आता माहिती अधिकारातून आणखी मोठी माहिती समोर आली आहे.”
दरम्यान, नाना पटोले यांच्या या धक्कादायक माहितीवर आणखी सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र पटोले यांच्या दाव्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसत आहे.