भारत, आफ्रिका, त्रिनिदाद, इंग्लंड अशा अनेक देशांत फिरलेला हा साहित्यिक. यातून त्यांनी अनेक प्रवासवर्णनं लिहिली. बालपणीच वाट्याला आलेल्या उपेक्षेतून भरारी घेत त्यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध केलं. उपेक्षितांच्या भावनेचा वास्तववादी वेध घेणाऱ्या या अफाट बुद्धिमत्तेच्या साहित्यिकाविषयी…
“आणीबाणी संपली होती. आणि माझं वर्षही. छोटासा हिवाळा वेगाने संपत चालला होता, उन्हात बसणं आता सुखावह वाटत नव्हतं, आता पावसाळ्यापर्यंत पुन्हा फुफाट्याचं उडणं काही थांबणार नव्हतं… भारताची जादू माझ्यावर काही चालली नव्हती. ती फक्त माझ्या बालपणाची, एका काळोख्या भागाची भूमी बनली होती. जितक्या वेगाने मी तिच्यापासून दूर, मिथकाच्या दुनियेत शिरत चाललो होतो, तितकं ते हिमालयातल्या खिंडींसारखं पुन्हा बंद होऊ लागलं होतं, मी बालक म्हणून ज्याची कल्पना केली होती तसंच ते कालातीत अस्तित्वात असल्यासारखं भासत होतं, ज्यामध्ये, भारताच्या भूमीवर मी जिथं जिथं गेलो, तिथं मी आत खोल शिरू शकलो नाही, हे मला माहीत आहे. हे स्वीकारायला मी एका वर्षात शिकलो नाही, आणि मी फक्त रहिवासी बनून राहिलो, कोणत्याही भूतकाळाशिवाय, कोणत्याही पूर्वजांशिवाय…’
व्ही. एस. नायपॉल यांनी 1964 मध्ये लिहिलेल्या “ऍन एरिया ऑफ डार्कनेस’ या साहित्यकृतीतला हा एक परिच्छेद. आपल्या बालपणाकडं, आपल्या जीवनप्रवासाकडं, पृथ्वीवरील अस्तित्वाकडं बघण्याचा दृष्टीकोन त्यांच्या या परिच्छेदातून स्पष्ट होतो. विदियाधर सूरजप्रसाद नायपॉल यांचा जन्म त्रिनिदादमध्ये 17 ऑगस्ट 1932 रोजी झाला. भौतिक आणि सांस्कृतिक उपेक्षा, बालपणापासूनच त्यांच्या वाट्याला आली. त्यातूनच त्यांच्यातल्या सुप्त लेखकाला चालना मिळाली. त्यांनी भारत आणि आफ्रिकेत प्रवास करत कित्येक वर्षे घालवली. या सगळ्या अनुभवांचं संचित त्यांच्या लिखाणात उतरलेलं दिसतं. सुरुवातीला त्यांनी विनोदी अंगाने जाणारं लेखन केलं. परंतु नंतरच्या काळात दुःखाच्या काळोखाखाली खोलात दडलेल्या वास्तवाचं चित्रण त्यांनी साहित्यातून केलं. गुलामगिरी, क्रांती, भ्रष्टाचारी राजकारणी, गरीब आणि उपेक्षित यांच्याविषयी लिहिताना समाजात खोलवर रूजलेल्या प्रस्थापित रूढी-परंपरांचं उत्खनन करायलाही ते कचरले नाहीत. धर्माच्या नावावर जगभरात सुरू असलेल्या दहशतवादासंबंधात त्यांनी खूप आधी लिहायला सुरुवात केली होती.
युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफोर्डची मानद पाठ्यवृत्ती (1983), मानद डॉक्टर ऑफ लेटर्स, कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, मानद लिट.डी., केंब्रिज, लंडन (1988) ब्रिटिश लिटरेचर प्राइझ, बुकर प्राइझ असे अनेक सन्मान नायपॉल यांच्या नावे आहेत, यातून त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कल्पना येऊ शकते.
नायपॉल यांची ग्रंथसंपदा प्रचंड आहे. त्यात “द मिडल पॅसेज’ (1962), “ऍन एरिया ऑफ डार्कनेस’ (1964), “इंडिया: अ वुंडेड सिव्हिलायझेशन’ (1977), “इंडिया: अ मिलीयन म्युटीनीज नाऊ’ (1990), “फाइंडिंग द सेंटर’ (1984), इत्यादी प्रवासवर्णनं तर “द मिस्टीक मॅस्युअर’ (1957), “अ फ्लॅग ऑन द आइसलॅंड’ (1967), “अ बेंड इन द रिव्हर’ (1979), “अ वे इन द वर्ल्ड’ (1994) आदी कादंबऱ्यांचा त्यात समावेश आहे. नायपॉल त्यांच्या कथांतून आपलेच रूप आपल्याला दाखवतात. भाषेचा नेमका आणि सुंदर वापर ही त्यांची भावणारी शैली आहे. साध्या, सशक्त शब्दांचा वापर करत ते आपल्यासमोर माणुसकीच व्यक्त करतात.
त्यांच्या “इन अ फ्री स्टेट’ (1971) मध्ये ते म्हणतात की, आपल्यापैकी प्रत्येकजण मुक्त व्यक्ती असण्याचा पर्याय निवडू शकतो. हा फक्त इच्छा आणि निवडीचा प्रश्न आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. अशाप्रकारच्या थेट, सडेतोड आणि बुद्धिवादी विधानांसह व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या आणि साहित्यिक प्रतिभेचा मानवतावादी आविष्कार असलेल्या या कादंबरीला बुकर प्राइझ देण्यात आलं.
“अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास’ (1961) ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीनं नायपॉल यांना जागतिक साहित्य वर्तुळात दिमाखात नेऊन बसवलं. ही भारतीय-त्रिनिदादी हिंदू असलेल्या मोहन बिस्वास यांची कहाणी आहे. मोहन हे यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात पण पुनःपुन्हा अपयशी ठरतात. एका प्रथितयश कुटुंबाचा जावई झाल्यानंतर तिथल्या सत्ता गाजवण्याचा अनुभव आणि चटके मोहन यांना बसू लागतात. तेव्हा आपण स्वतःचं घर कमवायचे असं ध्येय मोहन निश्चित करतात. या कादंबरीत वर्णन केलेल्या घटनांचं नायपॉल यांच्या वडिलांच्या जीवनातल्या काही घटनांशी साधर्म्य आहे, असं म्हटलं जातं. ही कादंबरी म्हणजे वसाहतवादी जगाचं वसाहतपश्चात दृष्टीने केलेले विश्लेषण आहे.
ही कादंबरी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची गोष्ट आहे. व्यक्तीचे एकाकीपण, नैराश्य आणि नाकारलेपण अशा समस्यांचा वेध या कादंबरीने घेतला आहे. स्त्री विषयक दृष्टीकोन हा या कादंबरीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातली बहुतांश स्त्री पात्रं असली तरी त्यांचं चित्रण काळजीवाहक, कान भरणाऱ्या किंवा गर्दीतले चेहरे असंच करण्यात आलंय. या स्त्रियांच्या कोणत्याही आकांक्षा नाहीत. स्त्रियांचे हे चित्रणदेखील वाचकाच्या काळजावर कायमस्वरूपी कोरले जाते.
नायपॉल यांनी पाहिलेलं आणि त्यांच्या साहित्यात चित्रित केलेलं जग अजिबात नाकारता येत नाही. हे आपण रोज जगत असलेल्या जगातच वसलेलं हे आणखी एक जग आहे ज्याच्याकडं कदाचित आपलं कधी चुकूनही लक्ष गेलं नसेल. हे जग भौतिक आणि सामाजिक गोष्टींनी ओतप्रोत भरलेलं आहे. ते मानवाच्या वास्तविक परिश्रमाशी स्पर्धा करणारी गुंतागुंत आणि विरोध यांच्या विदारकतेत दैनंदिन जीवन जगत आहे. नोबेल निवड समितीने “आधुनिक विचारवंत’ अशा शब्दांत गौरव केलेल्या या लेखणीच्या जादूगाराने 11 ऑगस्ट 2018 रोजी जगाचा निरोप घेतला.
-डॉ. भालचंद्र सुपेकर