मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यांच्या या भेटीमुळे राज्य सरकारच्या स्थीरतेबाबात शंका व्यक्त करणारे पतंग राजकीय वर्तुळात लगेच उडवण्यात येऊ लागले.
गेल्या आठवड्यात संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ ते मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यानंतर तिथून ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले होते. त्यामागे सरकारच्या स्थीरतेविषयी आव्हान असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शरद पवार आणि राऊत दोहोंनीही सरकार कार्यकाल पूर्ण करेल असे स्पष्ट करून अनिश्चिततेवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना-राष्ट्रवादीची गुप्त बैठक?
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.
सरकार वाचवण्याचा प्रश्न नाही, आम्ही एकत्र : पटोले
सरकार वाचवायचा प्रश्नच नाही आम्ही तिघेही सोबत आहोत. सरकार पाच वर्ष चालेल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, जरंडेश्वर कारखान्यावर इडीने केलेली कारवाई सूडबुध्दीने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राज्यातील सरकार पाडण्यासाठी केला जाऊ शकतो, असे संकेत राज्यातील सत्ताधारी पक्षाला मिळअल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आशिष शेलार आणि संजय राऊत यांनी या भेटीच्या वृत्ताचे खंडन केले असले तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे, हे निश्चित्त .