‘परीक्षा नसत्या तर?’ हा निबंधाचा विषय सर्वांनाच परिचित आहे. आपल्या मनातल्या परिक्षेबद्दलच्या भावना या निबंधाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनीच भरभरून प्रकट केल्या असतील. पण तेव्हा वाटलं होतं का की परीक्षा खरंच रद्द होतील? कोरोना विषाणूच्या जागतिक संकटामुळे मात्र ही वेळ आपल्यावर आली आहे. सर्व शाळा तसेच महाविद्यालयांच्या परीक्षा सरकारने रद्द केल्या. पण पदवीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत मात्र घोळ सुरु आहे. नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचे विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिसाद उमटले. परंतु, या निर्णयाच्या दोनच दिवसांनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हाव्यात असे सांगणारे पत्र दिले. यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
परीक्षा घ्यायची?
यंदा राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे जवळपास दहा लाख विद्यार्थी आहेत. गावाकडून पुण्या-मुंबईत तसेच मोठ्या शहरांमध्ये शिकायला येणार्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. लॉकडाऊनमुळे वसतिगृह बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परतावे लागले आहे. आता जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर बाहेरून पुण्या-मुंबईसारख्या हॉटस्पॉट क्षेत्रात येणार्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच वसतिगृह बंद असल्याने राहायचा प्रश्नही आहेच. जरी वसतिगृहे खुली केली तरी तिथे शारिरीक अंतराचा नियम कसा पाळणार हा मुद्दा ही महत्वाचा आहे.
सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारा कृषिकेश जगताप याविषयी म्हणतो, “इंजिनियरिंगच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आमचे मुलभूत शिक्षण हे पहिल्या तीन वर्षांमध्ये पूर्ण होते. आता त्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग हा चौथ्या वर्षात करायचा असतो. या तीन वर्षांमध्ये केलेले प्रोजेक्ट्स आणि प्रात्यक्षिके यामुळे हे ज्ञान पक्के होते. त्यामुळे आम्ही आवश्यक ते ज्ञान मिळवले आहे, आता परीक्षा घेतली नाही तरी फारसा फरक पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून सरकारने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.”
परीक्षा नाही घेतली तर?
समाजकार्य विषयात पद्व्युत्तर शिक्षण घेणार्या दिपेंती चिकणे हिच्या मते, परीक्षा न घेणे उत्तम आहे. अभ्यासात बराच खंड पडला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमही परिणामकारकरित्या पूर्ण झालेला नाही. ग्रेड देण्याच्या निर्णयामुळे किमान एक सर्टिफिकेट मिळून पुढे नोकरीसाठी प्रयत्न करता येतील आणि वेळ वाचेल. आता पुन्हा परीक्षा घ्यायच्या झाल्यास विद्यार्थी पुन्हा बॅकफूटवर येतील आणि पुढे नोकरीसाठीच्या प्रक्रियेलाही विलंब होईल.
“परीक्षा न घेण्याच्या आणि सरसकट सगळ्यांना पास करण्याच्या निर्णयामुळे या वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल तसेच यामुळे वर्षभर मनापासून अभ्यास केलेले विद्यार्थी आणि अभ्यासाच्या बाबतीत उदासिन असलेले विद्यार्थी यांच्यात काहीच फरक राहणार नाही. अशा विद्यार्थ्यांमुळे पुढे संपूर्ण बॅचची नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते. त्यामुळे थोडा उशीर लागला तरी चालेल पण परीक्षा व्हायला हव्यात”, असे मत पत्रकारितेचे शिक्षण घेणारी ऐश्वर्या दाखोरे हिने व्यक्त केले आहे.
या बाबतीत शिक्षकांनी उपस्थित केलेले मुद्देही लक्षात घेण्यासारखे आहेत. सातारा येथील सहाय्यक प्राध्यापिका अंजली साळुंखे यांच्या मते, अंतिम वर्षासोबतच सर्वच वर्षांच्या परीक्षा व्हायला हव्यात. पदवी ही महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे पास होणारे विद्यार्थी पुढे जाऊन स्वत:ला सिद्ध करू शकतील की नाही याबद्दल प्रश्नच आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष थोडे पुढे गेले तरी हरकत नाही पण परीक्षा व्हायला हव्यात.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या परीक्षा घेण्याच्या मतामुळे विद्यार्थी पेचात सापडले आहेत. परिक्षेबाबतची ही अनिश्चितता विद्यार्थ्यांना काळजीत टाकणारी आहे. राज्यपालांची मागणी लक्षात घेऊन सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल की परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहील याकडे आता राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार्या निर्णयात राजकारण नसावे अशीच चर्चा सध्या आजूबाजूला दिसून येते आहे. विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि त्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन सरकारने विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम लवकरात लवकर दूर करावा हीच अपेक्षा!
– वैष्णवी सविता सुनिल कारंजकर
(काॅलेज कनेक्ट रीपोर्टर)