उमेदवारांची मागणी : पद्धत पारदर्शक नसल्याचा आरोप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच परीक्षांद्वारे पदभरती करण्याची मागणी
पुणे – महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मात्र या परीक्षांना स्थगिती नव्हे, तर महापरीक्षा पोर्टलच बंद करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांतून होत आहे. या पोर्टलद्वारे परीक्षा न होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच विविध पदांची भरतीप्रक्रिया व्हावी, अशी मागणीही उमेदवारांची आहे.
महापरीक्षा पोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइनरित्या घेण्यात येणार असल्याचा निर्णय शनिवारी मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे. खऱ्या अर्थाने होतकरू व हुशार उमेदवारांना न्याय मिळाल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. राज्यभरात एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा घेण्याइतपत पायाभूत सुविधा सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे पारदर्शी पद्धतीने या परीक्षा होत नाहीत. त्यामुळे हे पोर्टलच बंद करणे आवश्यक आहे, असेच उमेदवारांचे म्हणणे आहे. दरम्यान, यावर आता शासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पोर्टलच्या निर्णयामुळे गेले कित्येक दिवस उमेदवारांच्या भविष्य आणि करिअरशी खेळणाऱ्या या गोष्टींना न्याय मिळतोय. बोगसगिरीला आळा बसेल. परंतु यापुढील परीक्षा पूर्वीप्रमाणे एमपीएससीद्वारे घेण्यात याव्यात.
– कुलदीप आंबेकर, स्टुडंट हेल्पिंग हॅंड.
मुख्यमंत्र्यांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती दिली, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र राज्य सरकारने यापुढच्या परीक्षाही पोर्टलद्वारे घेऊ नव्हेत. त्याऐवजी हे पोर्टलच बंद केले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सर्व परीक्षा या “एमपीएससी’द्वारे होणे आवश्यक आहे. तरच हुशार उमेदवारांना न्याय मिळेल.
– महेश बडे, एमपीएससी स्टुडंट राईट्स.