वाई – वाई तालुक्यातील गुळुंब-चांदक ओढा जोड प्रकल्पाच्या श्रेय
वादाची ठिणगी पडली आहे. गुळुंबच्या माजी सरपंच सौ. अल्पना यादव यांनी ही संकल्पना आपली स्वतःची असल्याचा दावा करत त्यावरील पुस्तक प्रकाशित केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाची संकल्पना ग्रामस्थ व शासनाची असून त्याचे श्रेय सौ. यादव यांनी एकट्याने घेतल्याने दोन्ही गावांमधील ग्रामस्थ संतापले आहेत. पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर व बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. तशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, हा ओढा जोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गुळुंबमधील प्रत्येक घराने एक हजार रुपयांचे योगदान दिले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आदी शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सीएसआर फंडातून शासनाकडून निधी मिळविला.
ज्ञानदीप सोसायटी, मॅप्रो फूडस्, आ. मकरंद पाटील यांच्या निधीतून सहकार्य मिळाले. किसनवीर सहकारी साखर कारखाना, महादेव मस्कर, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, ग्रामस्थ किसन माने यांनी खोदकामासाठी मोफत यंत्रणा उपलब्ध करून दिली. असे असताना सौ. अल्पना यादव यांनी पुस्तक प्रकाशित करून या ओढाजोड प्रकल्पाची संकल्पना आपली असल्याचा खोटा दावा केला आहे. पुस्तक प्रकाशनाला आलेल्या मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहेत.
वास्तविक प्रकल्प सुरू असतानाच्या कालावधीत सरपंच असल्याचा गैरफायदा घेत, या योजनेचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही. या पत्रकावर महादेव मस्कर, रवींद्र जाधव, राजेंद्र यादव, धर्माजी जाधव, विशाल यादव, सौ. यशोदा यादव, सौ. रूपाली मोरे, अजित जाधव, हिरामण यादव, सतीश जाधव, योगेश जाधव, दिलीप यादव, संजय यादव, संजय जाधव, राहुल यादव, विशाल जाधव, अनिकेत जाधव, तानाजी लंबाते, अमर जाधव, श्रीराम जाधव, सूर्यकांत यादव, विशाल यादव, सुधीर यादव, दिलीप मोरे, बाळासाहेब मोरे, विवेक महामुनी, प्रमोद यादव, रोहित दिरांगाने, दत्तात्रय टंकसाळे, रवींद्र किर्वे, शंकर भातुसे, दीपक पारखे व शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.