कराड – कराड शहरातील माजी नगरसेवकांनी एकत्रित येऊन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माजी नगरसेवक विचारमंचची स्थापना केली आहे. हा मंच पक्षविरहीत काम करणार असून त्या माध्यमातून शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे. त्यांच्या विधायक कामात सर्वोतोपरी सहकार्य करणार असून हा विचारमंच भविष्यात शहरातील विकासाची नांदी ठरेल असा विश्वास कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. शहरातील नागरिकांना भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या सोडविणे आणि पक्ष व संघटना विरहित काम करणे हा विचारमंचचा मुख्य उद्देश आहे.
याच नगरसेवकांनी यापूर्वी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शहरातील प्रश्नांची त्यांना जाण आहे. कराड शहर हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला चालणा देणारे आहे. स्व. आदरणीय पी. डी. पाटील यांनी ही जबाबदारी सर्व पक्षीय व संघटनांमधील नगरसेवकांच्या सहकार्याने पार पाडली आहे. त्यामुळेच नागरी सुविधांच्या बाबतीत कराडचा नावलौकिक झाला आहे. विधायक दृष्टीकोनातून स्थापन झालेल्या माजी नगरसेवक विचारमंचमधील नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय स्तुत्य असून तो भविष्यात विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त या विधायक कार्याला सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही आ. पाटील यांनी दिली आहे.