नवलेवाडी (ता. खटाव) – येथील मतदान केंद्रावर (मतदान केंद्र क्रमांक 250) ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक घोटाळा झाल्याच्या तक्रारी होत आहेत. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे कोरेगावच्या प्रांत तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलावडे यांनी स्पष्ट केले आहे. दि. 21 रोजी अभिरूप मतदानाच्या वेळी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादीचे दीपक पवार, दिलीप वाघ हे उपस्थित होते. त्यावेळी मुद्रण चिठ्ठीबाबत त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. सकाळी आठ ते सायंकाळी चार मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली आहे.
मतदारांनी कोणताही आक्षेप घेतला नाही, मात्र दुपारनंतर दीपक पवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्राध्यक्षांनी पंधरा रुपये भरून चाचणी मतदानासाठी जोडपत्र भरून देण्याचे सांगितले असता पवार यांनी नकार दिला. नंतरही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. त्यामुळे तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे नलावडे यांनी स्पष्ट केले.