मुंबई : राज्यात बहुमत चाचणी अगोदरच देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्याने आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता योग्य वेळ आल्यावर सगळ काही सांगेल असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांची मदत का घेतली हा सवाल केला असता त्यांनी हे उत्तर दिले आहे.
अजित पवारांच्या साथीने स्थापन करण्यात आलेले भाजपचे सरकार अवघ्या 80 तासात कोसळले आहे. मात्र भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांची मदत का घेतली, असा प्रश्न भाजप नेत्यांना वारंवार विचारला जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस उत्तरले आहेत. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा देत उद्धव ठाकरेंना नेतृत्व म्हणून स्वीकारले आहे. मंगळवारी महाविकासआघाडीच्या सर्व आमदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे हे येत्या 5 वर्षाच्या काळातले मुख्यमंत्री असतील, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली.
दरम्यान राज्यात तीन वेगळ्या भूमिकेच्या पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे हे सरकार कशा पद्धतीने काम करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजपने या सरकारला तीन चाकाची रिक्षा असे नावं दिलं आहे. तीन चाकाची रिक्षा व्यवस्थित चालते. मात्र जर ही तीन चाक तीन दिशेला गेली तर काहीही उपयोग होत नाही, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आहेत.