पुणे : आक्सफर्ड, केंब्रिज आणि हार्वर्ड या जुन्या विद्यापीठांनी मानवी इतिहासातील भयानक महासाथी पाहिल्या. तरीही ती विद्यापीठे कॅम्पस विद्यापीठे म्हणूनच आजही कार्यरत आहेत. कोरोनाची लाट संपल्यानंतर देशातही सर्व काही पूर्ववत होईल, असा विश्वास सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केला.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा 26 वा स्थापना दिन समारंभ करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ अस्मिता जगताप, सहकार्यवाह व.भा. म्हेत्रे, डॉ. के.डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकट काळात भारती हॉस्पिटलने जे रुग्ण सेवेचे काम केले ते कौतुकास्पद आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी कोरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले.
कोरोनाने वर्क फ्रॉम होम बरोबरच लर्न फ्रॉम होम ही संकल्पना शिक्षणक्षेत्राला दिली. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सर्वांनी विचारपूर्वक सामना केला पाहिजे. डॉ साळुंखे यांनी भारती विश्वविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागत केले. जी. जयकुमार यांनी आभार मानले.
कोरोनामुळे विद्यार्थी नसलेले विद्यापीठाचे ओसाड परिसर पाहणे क्लेशदायक वाटतें. बागा आहेत पण फुले नाहीत अशी अवस्था झाली आहे, असे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले. विध्वंसक कोरोनाने माणसांना स्वतः विषयी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. अशाश्वततेची जाणीव करून देताना साधेपणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे .