पावसामुळे तरकारी, किराणाचे भाव वाढले
निमसाखर – स्वयंपाकगृहात लागणाऱ्या किराणा मालाबरोबर व तरकारी भाज्यांचे भाव वाढल्याने बजेट कोलमडले आहे. बेसन, तेल, बटाटा यासह हिरव्या मिरचीचे भाव वाढले असून कोथिंबीरीची जुडी 20 ते 25 रुपयांपर्यंत गेल्याने स्पर्धेच्या काळातच सगळंच महाग झाल्याने हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
राज्यात गेले काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका आणि दरम्यानच्या काळात दिवाळी सण आला होता. यामुळे बाजारपेठेत किंचीतशी उलाढाल झाली. त्यानंतरच्या काळात परतीच्या पावसाने शेतपीकांचे झालेले नुकसान तसेच सत्तास्थापनेचा प्रश्न राजकीय कचाट्यात अडकल्याने रखडलेले पीकांचे पंचानामे आणि त्यातून दुर्लक्षित राहिलेला शेतकरी यामुळे राज्याची कृषि व्यवस्थाच डळमळीत झाली आहे.
किराणाभुसार मालाच्या बाजारपेठेत 50 किलोची बेसनाची गोणी 3100 रुपयांना मिळत होती ती गोणी 3200 ते 3500 रुपयाला झाली आहे. खाद्यतेलांबरोबरच पामतेलामध्ये 107 रुपयेची भाववाढ झाली आहे. गावागावातील आठवडा बाजारात 20 ते 25 रूपयांनी मिळणारा कांदा 45 ते 50 रूपये किलोवर गेला आहे. नवीन कांद्याची 30 ते 35 रुपयांनी किरकोळ विक्री होत आहे. मिरचीचे दरही दर आवाक्यात आले आहेत. महिनाभरापूर्वी शंभरी जवळ पोहचलेली मिरची 30 ते 40 रुपयांवर आली आली आहे.