नगर (प्रतिनिधी) – करोनाच्या संकटात आपल्या जीवाची परवा न करता जी मंडळी सेवा देत आहेत. हे सर्व मनपा कर्मचारी सामान्य कुटुंबातील आहे. त्यांना आवश्यक असणारी सुविधा आपण पुरवली पाहिजे. समाजासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिलेच पाहिजे, असे प्रतिपादन विनय वाखुरे यांनी केले.
विनायकराजं प्रतिष्ठाचे अध्यक्ष विनय वाखुरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत करोनाच्या संकट काळात अविरत सेवा पुरवणारे मनपाच्या आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचारीवर्गाला मास्क, सॅनिटायझर, ग्लोजचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, स्वच्छता निरीक्षक सुरज वाघ, आशीश हंस, विजय नवले, अजय रासकर, संदीप चौधरी, धवल पांड्या, महेश थोरात, मयूर कुलकर्णी, निखील मोयल, सुरज गायकवाड, शंतनू कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी सारसर म्हणाले, करोना आजून संपला नाही. सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊन उघडल्यावर नगर शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली. काही नागरिक तर चक्क मास्क न वापरता दुचाकीवर डबल, ट्रिपल सीट फिरतांना सध्या शहराच्या अनेक भागात दिसतात.