हैदराबाद – सर्वांनीच भाजपमुक्त भारत बनवण्याची प्रतिज्ञा करण्याची गरज आहे. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलली तरच आपण देश वाचवू शकतो, अशी भूमिका तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी सोमवारी मांडली.
एका सभेत बोलताना केसीआर यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गोलमाल पंतप्रधान म्हणून केला. मोदी आणि त्यांचे सरकार जे काही बोलते; ते सर्वच खोटे असते. गुजरात मॉडेल पुढे करून मोदी पंतप्रधान बनले. पण, दारूबंदी असणाऱ्या गुजरातमध्ये विषारी दारूचा प्रवाह मुक्तपणे सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
देशात 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपला शेतकरीविरोधी ठरवले. केसीआर यांनी भाजपविरोधात जोरदार राजकीय मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचालीही त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यातून राष्ट्रीय राजकारणातही भूमिका निभावण्यास ते सज्ज झाले आहेत. (Everyone needs to pledge to make India BJP-free – KCR)