लोणी काळभोर- गावाचा विकास व प्रगतीसाठी प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे. प्रत्येक वर्षाचा आराखडा बनवून ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सूचनांचा विचार करावा आणि गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करावा, असे मत हवेली पंचायत समितीचे कृषी विस्तार आधिकारी ए. एस. बागूल यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत सन 2020- 21 ते 2024-25 या कालावधीसाठी पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी गणस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बागूल म्हणाले की, गावचा विकास आराखडा तयार करण्यासाठी गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. लोकसहभागातून विकास आराखडा तयार केल्यास गावाचा सर्वांगीण विकास होऊन कायापालट होऊ शकतो. कार्यशाळेस मुख्य प्रशिक्षक जालिंदर काकडे यांनी प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, सरपंच अश्विनी गायकवाड, उपसरपंच सीमा काळभोर, आळंदी म्हातोबाच्या सरपंच कविता शिवरकर, उपसरपंच सारिका भोंडवे, माजी सरपंच वंदना काळभोर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचतगटांच्या अध्यक्ष, सचिव, कृषी सहायक सी. एस. रजपूत, मुक्ता गर्जे, पशुधन पर्यवेक्षिका लाडूकर, गावकामगार तलाठी दादासाहेब झंजे, ग्रामविकास आधिकारी डी. के. पवार, पी. एस. पवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका एस. एस. शिद आदी उपस्थित होते.