मुंबई – महाराष्ट्रात विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्याच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात असताना भगत सिंग कोश्यारींची एन्ट्री झाली. संघाचा हार्डकोअर स्वयंसेवक ते भाजपकडून उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले भगतसिंह कोश्यारी आल्यापासून चर्चेत राहिले.
भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई-गुजरात अश्या अनेक मुद्यांवर केलेल्या विधानावरून संपूर्ण राज्यात राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावरून ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली होती.
मात्र, अखेर आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी राजीनामा मंजूर केला आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केलं असून, यावेळी त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. महापुरुषांच्या बद्दल त्यांनी विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरुन अवमान केला होता. तेव्हाच त्यांचा राजीनामा घेयला हवा होता. त्यामुळे राज्यपाल यांचा राजीनामा हा उशिरा सुचलेले शहाणपण आहे. असा टोला संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांचा राजीनामा दोन महिन्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा त्यांनी अवमान केला होता तेव्हा, रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहे. त्या नव्या राज्यपाल यांना शुभेच्छा आहे. महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे, महापुरुषांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्य चालतं आहे त्यामुळे त्याबाबत नव्या राज्यपाल यांना माहिती असायला हवी.
राज्यपाल यांचा राजीनामा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना सांगितलं तेव्हा का निर्णय घेतला नाही, महाराष्ट्रात किती गदारोळ झाला तरी राजीनामा घेतला नाही, त्यांना कोणी पाठीशी घातले आहे सर्वांना माहिती आहे. असं देखील संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.