संगमनेर – करोनाचे संकट ही राष्ट्रीय आपती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचा सामना संपूर्ण देशवासीयांना करायचा आहे. माणूसकीचा धर्म जोपासत सामान्य माणसाला दिलासा आणि आधार देण्यासाठी प्रत्येकाने या लढाईत योगदान देण्याचे आवाहन, आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील 26 गावांमधील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. फाउंडेशनच्या वतीने ही मदत गरजूंपर्यंत पोच करण्यात येत आहे. आ. विखे पाटील म्हणाले, करोना संकटाने संपूर्ण विश्व चिंताग्रस्त झाले आहे. यामध्ये आपलाही देश असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने काळाची पावल वेळीच ओळखून घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे देशात करोना विरोधातची सामूहिक लढाई यशस्वी होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनच्या घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी आता इतर देश करू लागले असल्याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्हणाले, या आपत्तीत पंतप्रधान मोदी यांनी सामान्यांसाठी एक लाख 70 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे साह्य देवून मोठा दिलासा दिला आहे, असेही ते म्हणाले.