नवी दिल्ली – मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. लोकशाहीत विरोधकांची ताकद महत्त्वाची असते, विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्वाचा आहे. विरोधकांनी संख्याबळाची चिंता करु नये. सभागृह चालविण्यासाठी विरोधकांनी कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
मोदी म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा, स्वप्न घेऊन आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. पहिल्यांदाच महिला खासदारांची संख्या या १७व्या लोकसभेत सर्वात जास्त आहे. अनेक अडचणींवर मात करत बहुमतामध्ये पुन्हा एकदा जनतेने भाजपाला सत्तेत आणलं आहे. देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी लोकांनी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच जनतेच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांना पाठिंबा द्यावा. तसेच येणाऱ्या ५ वर्षामध्ये सदनाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार कायम करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिला.
Prime Minister Narendra Modi arrives at the Parliament for 17th Lok Sabha, says, "Every word of the Opposition is important." pic.twitter.com/TxTVzQkOF2
— ANI (@ANI) June 17, 2019
दरम्यान शेतकऱ्यांची बिकट अवस्था, बेरोजगारी, दुष्काळ, जम्मू-काश्मीरमधील निवडणुका यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे केली आहे. संसदेचे अधिवेशन आजपासून सुरु होऊन ते २६ जुलैपर्यंत चालणार आहे. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाईल.