मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीसंबंधी पुन्हा एकदा भाष्य केले असून एखाद्या व्यक्तीचे मत वेगळे असू शकते, पण ते पक्षाच्या बैठकीत मांडायचे असते असे सांगितले आहे. एखाद्या व्यक्तीचे मत वेगळे असू शकते. हे मत पक्षाच्या बैठकीत मांडल्यानंतर त्यादृष्टीने वेगळी पाऊले टाकली जाऊ शकतात. पण असे निर्णय व्यक्तिगत नसतात तर पक्षाचे असतात, असे सांगत अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले आहे.
शरद पवार यांनी साताऱ्यात प्रीतीसंगमावर यंशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बहुमत नसतानाही भाजपाने सरकार बनवले, केंद्रातील सत्ता, राज्यपाल याचा गैरवापर करण्यात आला, असल्याचा आरोपदेखील यावेळी शरद पवार यांनी केला. पक्ष म्हणून राष्ट्रावादी सरकारमध्ये सामील नाही. हा पक्षाचा निर्णय नाही, त्याच्याशी आम्ही सहमत नाही असे यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. ही निवड वैध आहे की नाही हा खरा प्रश्न असून राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान झाल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार यांना अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परततील का? असे विचारण्यात आले असता, मी कोणाच्याही संपर्कात नसल्याने मला काही माहिती नाही असे त्यांनी सांगितले. अजित पवारांची हकालपट्टी करायची की नाही हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नसून, पक्ष निर्णय घेईल असे यावेळी शरद पवारांनी सांगितले. अशा अनेक गोष्टी मी गेल्या 50 ते 52 वर्षात पाहिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनता या अशा प्रसंगी भक्कम उभी राहते हा माझा गेल्या वर्षांपासून अनुभव. मला यासंबंधी चिंता वाटत नाही, अशा संकटांमधून मार्ग निघत असतो, असेही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. या सगळ्यामागे शरद पवारांचा हात असल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. आम्ही सगळे पक्षासाठी काम करणारे नेते, कार्यकर्ते आहोत. त्यासाठी जे कष्ट करावे लागतील ते आम्ही करु. आमच्याकडे नेत्यांची मोठी फळी आहे. माझ्या सूचनेचा पक्षात अनादर होणार नाही याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.