मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, या शाळा सुरु करताना नियमांबाबत विसंगती असून, शाळाही संभ्रमात आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांला करोनाची लागण झाल्यास केवळ शेजारच्या मुलांचे विलगीकरण करावे, असे शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील नियमावलीत नमूद असताना करोनाबाधित आढळल्यास संपूर्ण वर्ग बंद करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालकांना मुलांना शाळेत पाठवणं जोखमीचं वाटत असेल तर त्यांनी पाठवू नये असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
सरकारकडून सुरु असलेल्या या संभ्रमाच्या परिस्थितीवर आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी, “राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो” असा टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना दिल्ली काबीज करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचाही आधार घेतला.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “शाळा सुरू ही करायच्या आणि मुलांना उपस्थितीचे बंधन नाही असे परस्पर विरोधी विधान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी करायचे. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि मुख्यमंत्री घरात बसून दिल्लीवर स्वारी करणार आहेत”.