नवी दिल्ली – हिंदू धर्म हा धर्म नसून जीवन जगण्याची एक पध्दती आहे. भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदुच आहे. हिंदू धर्माचे अनेक लोक दुसऱ्या देशांत गेले. मात्र त्यांनी कोणाचे धर्मांतर केले नाही, असे राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे.
मेघालयच्या दौऱ्यावर असलेले भागवत शिलॉंग येथे एका सभेत बोलताना म्हणाले की आपल्या पूर्वजांनी अनेक मोठी कामे केली. ज्या काळात येण्याजाण्याची साधने नव्हती, त्या काळात हिमालय पार करून जपानला ते गेले. सायबेरिया, मेक्सिकोपर्यंत ते पोहोचले. जेथे जेथे ते गेले तेथील लोकांना त्यांनी चांगले बनवले. कोणाचे धर्मांतर केले नाही. ते लोक जसे होते तसे त्यांना ज्ञान दिले, शिकवले, आयुर्वेदाचे ज्ञान दिले. त्यांना जसे आहे तसे सुशिक्षित केले. आज कोणी भारतीय तेथे गेला तर त्याला आदरपूर्वक नमस्कार केला जातो.
आम्ही कधी कोणाकडून काही हिसकावले नाही, लूटले नाही. केवळ लोकांना देत गेलो. आज श्रीलंकेच्या वाईट काळात भारतच त्या देशाच्या बाजूने उभा राहीला. करोनाची लसही आम्ही अन्य देशांना दिली. बाकीचे देश तर लसीचाही व्यापार करत होते. हिंदू शब्दांत त्या सगळ्यांचा समावेश होतो जे भारतमातेचे पुत्र आहेत. हिंदू बनण्यासाठी धर्म बदलण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी नमूद केले.