कालावधी : 1 डिसेंबर 2009 ते 13 मार्च 2012
राजकारणात दूरदृष्टीप्रमाणे स्वतःमध्येही काही अंगभूत गुण असणे महत्त्वाचे असते. तुम्ही स्वतः शिस्तप्रिय आणि अभ्यासू असाल तर तुमची सगळी कामे शिस्तबद्धच होणार. पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल यांना व्यायामाची, स्वच्छतेची आणि पर्यावरणाची आवड असल्यामुळेच या महानगरीचे सुंदर, स्वच्छ शहरात रूपांतर करणे शक्य झाले. शहरातील मोठमोठे प्रकल्प उभारण्यात योगेश बहल यांचा सिंहाचा वाटा आहे.
योगेश बहल यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर बजाज ऑटोमध्ये नोकरी केली. मात्र नोकरी करण्यामध्ये त्यांना जास्त रस नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करत असताना ते गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यामध्ये त्यांना विविध कलागुण दाखविण्याची संधी मिळाली. त्या काळातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1992 च्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी अजितदादा पवार व प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या विजयाची घौडदौड सुरू आहे. 1 डिसेंबर 2009 मध्ये ते पिंपरी चिंचवड शहराचे महापौर झाले.
योगेश बहल यांच्याकडे अफाट ज्ञान आहे. त्यांची कामाची हातोटी राज्यातील बड्या नेत्यांसमान आहे. त्याचाच वापर करत त्यांनी शहरात विविध विकासकामे केली. त्या विकासकामांनी शहराच्या वैभवात भर घातली. महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील ग्रेड सेपरेटर हा योगेशजींच्या कल्पनेतून आणि पाठपुराव्यामुळेच तयार झाला आहे. पूर्वी 40 मिनिटे लागणाऱ्या निगडी ते दापोडी या प्रवासी अंतराला आज केवळ 20 मिनिटे लागतात. यापाठीमागे योगेशजींची दूरदृष्टी आहे. नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपूल आज शहराचे सर्वात मोठे वैभव आहे. हा शहरातील पहिलावहिला उड्डाणपूल त्यांनी मंजूर केला. त्यामुळे वाहतूक सुुरळीत झाली.
वल्लभनगर येथील एसटी बसस्थानक आपल्या भागात आणण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले. पूर्वी कुठेही बाहेरगावी जायचे असेल तर स्वारगेट किंवा शिवाजीनगरला जावे लागत होते. आज त्यांच्यामुळेच शहरामध्ये सुसज्ज असे बसस्थानक उभे आहे. विद्यार्थ्यांबाबत त्यांनी अनेक सकारात्मक निर्णय घेतले. शहरामध्ये त्यांनी अद्यावत सायन्स पार्क उभारले.
ऑटो क्लस्टरच्या रुपाने शहरातील ऑटोमोबाईल उद्योगाला उपयुक्त अशी यंत्रणा उभारली आहे. डी वाय पाटील प्रतिष्ठान आपल्या भागात आणण्याच्या त्यांच्या निर्णयाला तिथल्याच लोकांचा प्रचंड विरोध होता. ही संस्था आपल्या भागात आल्यास आपल्या स्थानिक मुलांना वाईट सवयी लागतील अशी त्यांची समजूत होती. त्याला जबरदस्त आत्मविश्वासाने सामोरे जात त्यांनी ही संस्था शहरात आणली. त्यामुळे शहराचा चेहरामोहराच बदलला.
योगेशजींनी त्यांच्या काळात एकदाही महासभा तहकूब केली नाही. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांनी प्रत्येक विषयावर प्रत्येक नगरसेवकाला बोलण्याची संधी दिली. यामुळे शहराच्या विकासाच्या मुद्यांवर साधक-बाधक चर्चा होत होती. शहराला ग्रीन सिटी, क्लीन सिटी करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले.
ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरण संतुलन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय. झाडे लावा झाडे जगवा, वाढवा ही भावना दृढ झाल्याशिवाय सिमेंटच्या वाढत्या जंगलात ग्लोबल वॉर्मिंग केवळ अशक्य आहे, असा त्यांचा पक्का विश्वास आहे. शहरात नदीसुधार, स्वच्छता, सुशोभीकरण करून त्यांतच जास्तीत जास्त पाणी राहण्यासाठी आवश्यक ती स्वच्छता ठेवण्यावर त्यांनी भर दिला. शहरातील विकासकामांवर नजर टाकली की मोठ्या कामांची मूहर्तमेढ ही योगेशजींच्या काळातच झाल्याचे दिसून येते. म्हणूनच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा महामेरू म्हणजेच महापौर योगेश बहल अशी त्यांची ओळख झाली.
योगेश बहल यांची दूरदृष्टी त्यांनी केलेल्या विविध विकासकामातून दिसते. शहरात महिलांसाठी त्यांनी शालेय शिक्षणाव्यतिरिक्त मुलांना इतर वाचनिय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दोन सुसज्ज ग्रंथालये त्यांनी उभी केली. याशिवाय ब्रिटीश लायब्ररीसारखी चांगल्यात चांगली ग्रंथालये आपल्या भागात आणण्याचा त्यांचा मानस आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये अद्यावत तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध केली. चांगल्या आरोग्यासाठी चांगला व्यायाम महत्त्वाचा असल्याचे ते सांगतात. त्यासाठीच त्यांनी दोन व्यायामशाळांची आपल्या भागात उभारणी केली.