कोपरगाव – कोपरगाव शहरात मोकाट जनावरांच्या उपद्रव्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. नगरपालिकेकडे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र पालिकेला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. अखेर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आरोग्य निरीक्षक बापू आरण यांनी वैयक्तीक लक्षा घालून शहरातील मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यासाठी आठ कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, या पथकाने मागील तीन दिवसांत शहरातील 43 भटकी कुत्री पकडली आहेत.
येत्या आठ दिवसांत शहरातील मोकाट कुत्री, जनावरे पकडण्याची मोहीम गतिमान करणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली. शहरातील मोकाट सोडलेल्या गायी, गाढवांच्या मालकांनी आपली जनावरे घेऊन जावीत, अन्यथा पालिकेकडून या जनावरांच्या मालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य निरीक्षक बापू आरण यांनी दिला आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण अचानक वाढले आहे. ही कुत्री कोपरगावमध्ये बाहेरील कुणीतरी सोडली असावीत, असा संशय पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेजारील शहरातील अथवा कोणत्यातरी भागातील ही कुत्री पकडून महामार्गावर सोडली असावीत, असाही अंदाज वर्तविला जात आहे. सध्याच्या वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येने कोपरगावचे नागरिक त्रस्त झाले आहेत.
पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागतो. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक यांनाही मोकाट जनावरांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातल्या प्रत्येक चौकात मोकाट जनावरे, कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे. टोळीने फिरणारा कुत्र्यांचा कळप आणि रस्त्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या गायी, गाढवे यांच्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. काहीवेळा चौकांमध्ये भररस्त्यात बसलेल्या गायींमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. नगरपालिकेने ही पकडलेली कुत्री जंगलात सोडून देण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने
दिली आहे.