मुंबई – आर्थिक विवंचनेमुळे गेल्या चार महिन्यांपासून घरघर लागलेल्या जेट एअरवेजची विमानवाहतुक आज (बुधवार) मध्यरात्रीपासून थांबवण्यात येणार आहे. या विमान कंपनीच्या अखेरच्या विमानाने मध्यरात्री दिल्ली ते अमृतसर उड्डाण केले. अर्थसहाय्य करणाऱ्या बॅंकांनी जेट एअरवेजला 400 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास नकार दिल्यामुळे अखेर विमान सेवा थांबवण्याचा अप्रिय निर्णय घ्यावा लागला, असे जेट एअरवेजने प्रवाशांना कळवले आहे.
जेट एअरवेजच्या संचालक मंडळाची मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये भांडवली कंपन्यांना 400 कोटींचे अर्थसहाय्य मागण्यासाठीचे सर्वाधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांना निर्णयाचे देण्यात आले. मात्र विनंती केल्याप्रमाणे असे अर्थसहाय्य दिले जाऊ शकणार नसल्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बॅंकांच्या परिषदेकडून जेट एअरवेजला कळवणंयात आले आहे.
वित्तीय संस्थांकडून तातडीने कोणतीही आर्थिक मदत दिली जाऊ शकणार नाही, तसेच अन्य कोणत्याही मार्गाने निधीचा स्रोत निर्माण केला जाऊ शकणार नाही. त्यामुळे जेट एअरवेज कंपनीला विमानसेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी इंधन आणि अन्य आवश्यक सेवांचा खर्च करणे शक्य होणार नाही. त्यामुळे विमानसेवा हंगामी स्वरुपात थांबवावी लागणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.