नवी दिल्ली – लॉकडाउनमुळे काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये अडकलेले भारतीय अखेर मायदेशी परतले आहेत. एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांना भारतात आणण्यात आले. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास एअर इंडियाच्या 381 विमानाने दिल्ली एअरपोर्टवर लॅंड केले. या विमानात एकूण 234 प्रवासी होते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या या मोहिमेला “वंदे भारत मिशन’ नाव देण्यात आले आहे. गुरुवारी रात्री 10.20च्या सुमारास एअर इंडियाचे पहिले विमान अबू धाबीवरुन केरळच्या कोची विमानतळावर दाखल झाले. तसेच बांगलादेशातील 168 भारतीय विद्यार्थी आज विशेष विमानाने भारतात मध्यरात्री दाखल झाले आहेत. करोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. त्यामुळे जवळपास 15 हजार भारतीय वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना विशेष विमानाने परत आणण्यात येणार आहे.
दरम्यान, नौदलाची सुद्धा यासाठी मदत घेण्यात आली आहे. नौदलाने या मिशनला “ऑपरेशन समुद्र सेतू’ नाव दिले आहे. हा ऑपरेशनद्वारे मालदीवमधून आज 700 भारतीयांना मायदेशी रवाना करण्यात आले आहे. तसेच बहरीन, यूएई, अमेरिका, मलेशिया, कुवैत आणि सिंगापूर या देशांमध्ये भारतीय नागरीक अडकले आहेत. परदेशातून येणाऱ्या सर्व भारतीयांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.