नवी दिल्ली: तीन मे रोजी म्हणजे जवळजवळ 72 तासानंतर डाऊनची मुदत संपणार असतानाच लष्कर प्रमुख आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तीनही सैन्यदलाचे प्रमुख माध्यमांना संबोधित करणार आहेत. काही वृत्तवाहिन्या हे वृत्त प्रसारित करीत आहेत.
सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह, वाणिज्यमंत्री पियुष गोयल, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी तपशिलात चर्चा केली. याचा अर्थ लॉक डाऊन कशाप्रकारे शिथील करायचे याबाबत सरकार विचार करीत असल्याचे बोलले जाते.
देशभरात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यात आलेले आहेत. ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील कामकाज काही प्रमाणात सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत लष्कराची काय भूमिका असू शकते याचे स्पष्टीकरण लष्कर प्रमुख या पत्रकार परिषदेत करण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत देशभरात लॉक डाऊन सुरू असले तरी या सर्व बाबींना नागरी प्रशासनाने उत्तम प्रकारे हाताळले आहे. या कामी लष्कराची फारशी मदत घेण्यात आलेली नाही. आता लष्कराची भूमिका काय असेल हा माध्यमांच्या दृष्टिकोणातून सायंकाळपर्यंत चर्चेचा मोठा मुद्दा असणार आहे. केंद्र सरकारने माल वाहतुकीस पूर्णपणे परवानगी दिलेली आहे. स्थलांतरित कामगारांना आपल्या राज्यात जाण्याची परवानगी दिलेली आहे. अशा अवस्थेत लष्कराची काय भूमिका असेल त्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.